श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ, हा कलियुगातील एक परम पवित्र आणि तेजस्वी अवतार मानला जातो. इ.स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर या पावन क्षेत्रात, अप्पल राजु आणि सुमती या धर्मपरायण दांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले. त्यांचा जन्म हा दत्तप्रभूंच्या आद्य अवताराचे प्रतीक आहे. पिठापूर येथील या अवतारानंतर, त्यांनी कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या रूपात दुसरा अवतार धारण करून भक्तांना अद्भुत चरित्र दाखविले.

श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र अतिशय प्रेरणादायी आहे, परंतु सरस्वती गंगाधर रचित “श्री गुरुचरित्र” या मराठी ग्रंथात त्यांच्या जीवनाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे सुमती आणि अप्पल राजु यांचे तिसरे संतान होते. त्यांना श्रीधर राज शर्मा आणि रामराज शर्मा हे दोन भाऊ, तसेच श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. त्यांचे मातामह ब्रह्मश्री मल्लादी बापन्नावधानुलु आणि मातामही अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा यांचा आशीर्वाद त्यांना लाभला होता.

या दिव्य चरित्राची रचना शंकर भट्ट नावाच्या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली. नंतर या ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला. या ग्रंथात असे नमूद आहे की, “हा ग्रंथ बापन्नाचार्युलुच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल,” आणि सध्या ती ३३वी पिढी अस्तित्वात आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र पठण करणे हे भक्तांसाठी अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी आहे.

sripada-srivallabha-charitamrit-granth

श्रीपाद प्रभूंचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा शंकर भट्ट यांचा संकल्प अत्यंत प्रशंसनीय आहे. हा ग्रंथ पुढे तेलुगू भाषेत अनुवादित झाला, आणि मूळ संस्कृत ग्रंथाप्रमाणेच अनुवादित ग्रंथाच्या पठणाचे फलही समान आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कुठेही, भक्तिभावाने पठण केल्यास, श्रीपाद स्वतः सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी उपस्थित राहून ते श्रवण करतात. यासंबंधी एक मनोहर कथा आहे, जी भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागवते.

श्रीपाद प्रभू सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांचा वेदोक्त पद्धतीने उपनयन संस्कार संपन्न झाला. त्या काळात अशा शुभ प्रसंगी संपन्न गृहस्थांच्या घरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असे. बापन्नार्युलु यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही+ नाही. त्यांनी आपल्या बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. सर्वजण उत्साहाने दत्तचरित्र ऐकण्यासाठी जमले. दत्तदास नावाच्या भक्ताने चरित्र सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले, “पूर्वीच्या युगात अनसूया आणि अत्री ऋषी यांना दत्तात्रेय नावाचा पुत्ररत्न प्राप्त झाला. तेच दत्तप्रभू आता कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठापूर येथे अवतरले आहेत. आज त्यांचा उपनयन संस्कार झाला, आणि ते आता अधिकच तेजस्वी आणि दिव्य दिसत आहेत. अशा दीनोद्धारक प्रभूंचे मंगल सदा होवो.”

ही कथा दत्तदासांनी तन्मयतेने सांगितली, आणि श्रोते भक्तिभावाने ऐकत होते. अशा प्रकारे त्यांनी तब्बल त्रेपन्न (५३) वेळा कथन केले. कथन संपल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी दत्तदासांवर आपली कृपादृष्टी टाकली. उपनयनानंतर श्रीपाद यांनी तिथे उपस्थित ब्राह्मणांना सांगितले की, ते मालदासरीच्या घरी जाणार आहेत. कारण विचारले असता, श्रीपाद म्हणाले, “विशुद्ध अंतःकरणाने दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने प्रत्येक कथन एक अध्याय मानले, तर त्याने त्रेपन्न अध्याय पूर्ण केले आहेत. माझ्या चरित्राचे त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला त्वरित फल देण्यासाठी मी तिथे जाणार आहे.”

परंतु ब्राह्मणांनी श्रीपाद यांना दत्तदासांकडे जाण्याची परवानगी नाकारली. यामुळे श्रीपाद क्रोधित झाले आणि म्हणाले, “तुम्ही नीच जातीच्या लोकांना पंचम म्हणून दाबून ठेवता, पण माझी कृपा त्यांच्यावर अधिक आहे. येणाऱ्या काळात ते उन्नत होतील, आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांच्या सेवकवृत्तीमुळे धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट होईल. माझे वचन हे काळ्या दगडावरील रेघेसारखे आहे, त्यात कधीही बदल होणार नाही. तरीही, जो ब्राह्मण धर्मनिष्ठेने दत्तभक्ती करेल, त्याची मी नेहमी रक्षा करेन.”

श्रीपाद यांच्या क्रोधाला त्यांच्या माता-पित्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने श्रीपाद शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले. त्याच वेळी, दत्तदासांच्या घरी श्रीपाद यांनी आपल्या मंगलमय, दिव्य स्वरूपात दर्शन दिले. त्यांनी दत्तदासांनी प्रेमाने अर्पण केलेली फळे आणि दूध स्वीकारले. त्यांनी आपल्या हाताने सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि प्रत्येकाला आशीर्वाद दिला. दत्तदासांना उद्देशून श्रीपाद म्हणाले, “शंकर भट्ट, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. मला कुल, गोत्र किंवा भौतिक परिस्थिती यांच्याशी काही देणेघेणे नाही. माझा प्रसाद कोणीही, कितीही नीच कुलातील असला, तरी भक्तीने स्वीकारावा. जर तो प्रसाद नाकारला, तर त्या व्यक्तीला कष्ट आणि नाशाला सामोरे जावे लागेल.”

१) जिथे माझ्या चरित्राचे पठण होईल, तिथे मी सूक्ष्म रूपाने उपस्थित असेन.
२) जे भक्त मन, वाणी आणि कर्माने मला समर्पित असतील, त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन.
३) माझे सतत ध्यान करणाऱ्यांचे सर्व कर्म, मग ते कितीही जन्मांचे असोत, मी भस्म करेन.
४) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी आपल्या संपूर्ण तेजाने वास करते.
५) तुमचे अंतःकरण शुद्ध असेल, तर माझी कृपा तुमच्यावर सदा कायम असेल.

प. पू. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर हे दत्तसंप्रदायातील एक थोर सत्पुरुष आणि भक्त होते. त्यांना श्री दत्तगुरूंच्या एका अलौकिक अनुभवातून प्रेरणा मिळाली, आणि त्यांनी “श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत” या पवित्र ग्रंथाचे मराठी भाषेत भाषांतर केले. भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील, असंख्य दत्तभक्त मराठी भाषिक आहेत. त्यांच्यासाठी हा ग्रंथ मराठीत उपलब्ध करून देणे हे श्री हरिभाऊ जोशी यांचे दत्तभक्तांवरील एक अपार उपकार आहे. श्री भाऊमहाराज हे श्री दत्तमहाराज कविश्वर यांचे कृपापात्र शिष्य होते, आणि त्यांच्या आशीर्वादाने हा महान कार्य त्यांनी पूर्ण केला.

हा मूळ ग्रंथ अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. श्री हरिभाऊ जोशी यांनी अथक परिश्रमाने त्याची नवीन, सुबद्ध प्रत तयार केली. मूळ ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी जीर्ण प्रतीचे विजयवाड्याजवळील कृष्णा नदीत विधिवत विसर्जन केले. नवीन प्रतीचे पारायण इ.स. २००१ मध्ये विजयादशमीपासून अश्विन कृष्ण ११ पर्यंत पिठापूर येथील “श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान” येथे श्रीपाद प्रभूंच्या सान्निध्यात करण्यात आले. पारायणानंतर ही प्रत संस्थानला अर्पण करण्यात आली, ज्यामुळे दत्तभक्तांना हा ग्रंथ उपलब्ध झाला.

“श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत” हा ग्रंथ अक्षरशः सत्य आणि शक्तियुक्त आहे. यातील प्रत्येक शब्दात श्रीपाद प्रभूंची दिव्य शक्ती सामावलेली आहे. या ग्रंथात कोणतीही अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णने नाहीत. ग्रंथाचे लेखक, श्री शंकर भट्ट, हे विद्वान किंवा पंडित नव्हते, परंतु त्यांची श्रीपाद प्रभूंवरील अटळ श्रद्धा आणि भक्ती यामुळे श्रीपादांनी त्यांच्यावर विशेष कृपा केली. त्यांच्या प्रेरणेने हा ग्रंथ संस्कृत भाषेत रचला गेला. या ग्रंथाचे सात दिवसांचे पारायण करून, ११ जणांना अन्नदान केल्यास तत्काळ फलप्राप्ती होते, असे ग्रंथात नमूद आहे.

भारतवर्ष हे परम पवित्र आणि अवतारभूमी आहे. येथे अनेक दैवी अवतारांनी जन्म घेऊन भक्तांचे कल्याण केले. परंतु, भगवान दत्तात्रेय हे भक्तांच्या रक्षणासाठी सदा भूतलावर वास्तव्य करतात. केवळ स्मरणाने प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, म्हणून त्यांना “स्मर्तृगामी” असे संबोधले जाते. कृतयुगात, अत्री ऋषी आणि अनसूया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन दत्तात्रेयांनी अवतार धारण केला आणि दत्तभक्तीचा कल्पवृक्ष या भूतलावर रोवला.

त्यांचा दुसरा अवतार इ.स. १३२० मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी (गणेश चतुर्थी) या शुभदिनी, आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथे झाला. कृष्ण-यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र आणि भारद्वाज गोत्रात जन्मलेले ब्रह्मश्री घंडिघोटा अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्यवती सुमती देवी यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले. त्यांच्या बाललीला या भगवान बालकृष्णाच्या लीलांप्रमाणे मधुर आणि चमत्कारिक होत्या. पिठापूर येथे १६ वर्षे आणि कुरवपूर येथे १४ वर्षे, अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक लीलांचे प्रदर्शन करून भक्तांना इहलोक आणि परलोकातील सुख प्रदान केले. दुष्टांचा नाश आणि शिष्टांचे रक्षण यासाठी हा अवतार होता. त्यांनी अनेक अहंकारी व्यक्तींचा गर्वहरण केला, भक्तांचे संकटातून रक्षण केले आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अमर्याद वाढविला.

पिठापूर हे प्राचीन काळापासून सिद्ध क्षेत्र आहे. पौराणिक कथेनुसार, गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला, तेव्हा त्याचे मस्तक गया येथे आणि पाय पिठापूर येथे होते, म्हणून या क्षेत्राला “पादगया” असे म्हणतात. गयासुराला सूर्योदयापूर्वी न उठण्याचा आदेश होता, परंतु भगवान शंकराने मध्यरात्री कुक्कुट रूप धारण करून बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला, आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला. हे कुक्कुटेश्वर मंदिर पिठापूरात आहे.

दक्ष यज्ञात सतीदेवीने योगाग्नीने आत्मदहन केले, आणि भगवान शंकर तिचा देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड केले, आणि ते खंड जिथे पडले, तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. अष्टादश शक्तिपीठांपैकी पुरुहत्तिका शक्तिपीठ पिठापूर येथेच आहे. तसेच, भारतातील पाच माधव मंदिरांपैकी एक, कुंती-माधव मंदिर, येथे आहे, जिथे पांडव माता कुंतीने माधवाची पूजा केली होती. यामुळे पिठापूरला “दक्षिण काशी” असेही संबोधले जाते. परंतु, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या क्षेत्राचा महिमा असीम वाढला आहे.

“श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत” ग्रंथाचे लेखक श्री शंकर भट्ट हे श्रीपादांचे समकालीन आणि कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण होते. श्रीपादांच्या कृपेने त्यांनी हा ग्रंथ संस्कृतमध्ये रचला, आणि नंतर त्याचा तेलुगू अनुवाद झाला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भविष्यकालीन घटनांचा उल्लेख आहे. काही उदाहरणे:

१) हा ग्रंथ मल्लादी बापन्नावधानुलु (श्रीपादांचे मातामह) यांच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल. सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलु हे त्यांचे ३३वे वंशज आहेत, आणि त्यांनी हा ग्रंथ संस्थानला अर्पण केला.
२) श्रीपादांनी सांगितले की, त्यांचा पुढील अवतार कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती नावाने होईल. तिथून ते गंधर्वपूर आणि कर्दळीवनात जातील, ३०० वर्षे समाधीत राहतील, आणि नंतर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने प्रकट होतील.
३) श्रीपादांचे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे समर्थ रामदास स्वामी होतील, आणि नरसिंह वर्मा हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्म घेऊन रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील.
४) श्रीपादांचे दुसरे बंधू राम शर्मा हे श्रीधर नावाने महायोगी होतील.
५) श्री रामचंद्रांनी हनुमानाला दिलेली माणिक माला “माणिक प्रभू” म्हणून अवतरेल. याशिवाय, साईबाबा, गाडगे महाराज यांचाही भविष्यवाणी रूपात उल्लेख आहे

श्रीपादांचा अवतार गणेश चतुर्थीला झाला, हे विशेष आहे. गणेशाचा पुत्र “लाभ” हा एका युगात लाभाद महर्षी म्हणून प्रसिद्ध होता आणि श्रीकृष्ण अवतारात नंद म्हणून जन्मला. श्रीपादांच्या काळात तो त्यांचे मातामह म्हणून अवतरला. श्रीपादांनी विघ्नविनाशक तत्त्व आत्मसात करून चित्रा नक्षत्रात अवतार घेतला आणि हस्त नक्षत्रात कुरवपूर येथे अदृश्य झाले. जन्मपत्रिकेतील २७ नक्षत्रांमुळे होणारे अनिष्ट फल नष्ट करण्यासाठी भक्त “मंडल दीक्षा” घेतात. एका मंडलात (४० दिवस) श्रीपादांचे अर्चन किंवा चरित्राचे पारायण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचे प्रकंपन ४० दिशांना प्रसरण पावतात. हे प्रकंपन श्रीपाद प्रभूंकडे वळवल्यास ते त्यांच्या चैतन्यात विलीन होतात आणि साधकाच्या धर्मानुसार त्याच्या इच्छा पूर्ण होतात.

श्री शंकर भट्ट यांनी रचलेला हा ग्रंथ काही काळ श्रीपादांच्या मातामहांच्या घरी होता. नंतर त्याचा तेलुगू अनुवाद झाला, आणि मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. असे मानले जाते की, गंधर्वांनी तो पिठापूर येथे जमिनीत खोलवर पुरला. श्रीपादांच्या पादुकांसमोर हा ग्रंथ वाचून दाखवण्यात आला, आणि पाच भक्तांनी तो श्रवण करून धन्यता प्राप्त केली. मल्लादी बापन्नाचार्युलु यांच्या ३३व्या पिढीत हा ग्रंथ तेलुगूत प्रकाशित झाला. ज्या भक्तांनी हा ग्रंथ उदयास आणला, त्यांनी पिठापूर येथील महासंस्थानात पारायण करून तो श्रीपादांच्या चरणी अर्पण केला. पारायणादरम्यान, गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद भक्तांना प्राप्त होतो, असे श्रीपादांचे तेजोमय वचन आहे.

|| श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो ||