संत ज्ञानेश्वर


मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. ॥२-१॥


sarth-dnyaneshwari-adhyay-dusara

तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यायोगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर ॥२-२॥


ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्‍याने मेघ हलतात, त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे, परंतु त्यावेळी द्रवले. ॥२-३॥


म्हणून मोहाधीन झालेला तो आर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. ॥२-४॥


पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. ॥२-५॥


तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय ? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. ॥२-६॥


सांग तुला झाले तरी काय ? काय कमी पडले ? काय करावयाचे चुकले ? हा खेद कशाकरता ॥२-७॥


तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे ॥२-८॥


तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. ॥२-९॥


तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवातकवचांचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. ॥२-१०॥


तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच तुच्छ आहे असे वाटते. पार्था तुझा असा पराक्रम चांगला आहे. ॥२-११॥


पण तोच तू या वेळी आपला वीरपाणा टाकून, खाली मान घालून, रडत आहेस. ॥२-१२॥


विचार कर. तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करूणेने तुला दीन करून सोडावे ! सांग बरे अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय ? ॥२-१३॥


अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय ? किंवा अमृताला मरण आहे का ? अरे विचार कर. लाकूडच अग्नीला गिळून टाकील काय ? ॥२-१४॥


किंवा मिठाने पाणी विरघळेल काय ? दुसर्‍याच्या संसार्गाने काळकूट मरेल काय ? सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय ? ॥२-१५॥


कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय ? असे अघटित कधी घडले आहे का ? पण तो अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास. ॥२-१६॥


म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. ॥२-१७॥


हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युधाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची ? अशा भलत्यावेळी तिचे काय प्रयोजन ? ॥२-१८॥


अरे तू चांगला जाणता आहेस. तर मग आता विचार करून का पहात नाहीस ? युद्धाच्यावेळी कारुण्य उचित आहे काय ? सांग बर. ॥२-१९॥


श्रीकृष्ण (पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. ॥२-२०॥


म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुना हा खेद टाकून दे. ॥२-२१॥


तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ॥२-२२॥


लढईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत ? ॥२-२३॥


हे तू पूर्वीच जाणत नव्हतास का ? किंवा या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का ? आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजिल कळवळा का ? ॥२-२४॥


आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का ? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहेमीचेच आहे. ॥२-२५॥


मग आताच काय झाले ? ही ममता कोठून उत्पन्न झाली ? हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. ॥२-२६॥


ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील. ॥२-२७॥


ह्यावेळी अंत:करणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. ॥२-२८॥


याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला ? ॥२-२९॥


देवा, इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर. की हे युद्ध आहे का ? ॥२-३०॥


हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. ॥२-३१॥


पहा आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा बरे करावा ? ॥२-३२॥


देवा, संतसमुदायाला वंदन करावे, अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी ? ॥२-३३॥


त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ? ॥२-३४॥


ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा, आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे ? ॥२-३५॥


यापेक्षा आग लागो या जिण्याला ! सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे ? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची का ? ॥२-३६॥


मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय ? ॥२-३७॥


अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी, त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासुर आहे ? ॥२-३८॥


देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो. तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. ॥२-३९॥


हे आकाश अमर्याद आहे खरे. पण कदाचित त्य़ाचेही मोजमाप होईल. पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे. त्याचा ठाव लागणार नाही. ॥२-४०॥


एकवेळ अमृतही विटेल, किंवा कालवशात वज्रही भंगेल. पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही. ॥२-४१॥


ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे. परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. ॥२-४२॥


अर्जुन म्हणाला – हे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहेत. ॥२-४३॥


इतके हे मोठे आहेत. शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का ? सांग बरे ॥४४॥


अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंत:करणापासून मनात येत नाही. ॥२-४५॥


द्रोणाचार्यांसारख्यांना मारावे, तेव्हा आपण राज्यसुख भोगावे अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदादिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नकोत. यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ॥२-४६॥


अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरिकंदरांचा आश्रय घ्यावा, पण यांच्यावर शस्त्र धरू नये. ॥२-४७॥


देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले जे भोग भोगायचे ॥२-४८॥


ते मिळवून तरी काय करायचे आहेत ? रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे ? याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. ॥२-४९॥


त्यावेळी ‘कृष्णा ऐक’ असे अर्जुन म्हणाला. परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. ॥२-५०॥


हे जाणून अर्जुन भ्याला. मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत ? ॥२-५१॥


बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो. परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. ॥२-५२॥


पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. ॥२-५३॥


आता अशांचा वध करावा किंवा यांना येथे सोडून निघून जावे या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही. ॥२-५४॥


आम्हाला काय करणे उचित आहे, हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही. कारण मोहामुळे माझे चित्त व्याकूळ झाले आहे. ॥२-५५॥


डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तु दिसेनाशी होते. ॥२-५६॥


देवा, तसे मला झाले आहे. कारण माझे मन भ्रांतीने गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. ॥२-५७॥


तरी श्रीकृष्णा, तू (यासंबंधीचा) विचार करून पहा. आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग. कारण आमचा सखा, (आमचे) सर्व तू काही तूच आहेस. ॥२-५८॥


आमचा गुरु, बंधु, पिता, तू आमची इष्ट देवता, संकटसमयी नेहेमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस. ॥२-५९॥


शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरूच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ? ॥२-६०॥


किंवा कृष्णा ऐक. मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार ? ॥२-६१॥


त्याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल ॥२-६२॥


तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू. ॥२-६३॥


हे सर्व कूळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशावाचून दुसर्‍या कशानेही जाणार नाही. ॥२-६४॥


या वेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली, किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ॥२-६५॥


ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्य़ास अंकुर फुटणार नाही. ॥२-६६॥


किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो ॥२-६७॥


त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे (श्रीकृष्णा), तुझी कृपाच माझा आधार आहे. (तीच उपयोगी पडेल). ॥२-६८॥


जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला. पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. ॥२-६९॥


ज्ञानेश्वर महाराज म्हणातात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे. त्याला महामोहरूपी काळसर्पाने ग्रासले असावे. ॥२-७०॥


मर्मस्थान जे हृद्यकमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाहीत. ॥२-७१॥


त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला. ॥२-७२॥


तशा त्या व्याकूळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण शोभत होताच. तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहज रक्षण करील. ॥२-७३॥


हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी साप चावला आहे असे मी म्हटले आहे. ॥२-७४॥


ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा ॥२-७५॥


ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता ॥२-७६॥


म्हणून स्वभावत: सुनीळ (अत्यंत सावळा) व कृपामृतरूप जलाने युक्त असा तो श्रीकृष्णरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला. ॥२-७७॥


तेथे (श्रीकृष्णरूपी मेघाचे ठिकाणी) सुंदर दंतावलीचे तेज हीच जणु काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. ॥२-७८॥


आता तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ॥२-७९॥


ते पहा. ही कथा समाधानवृत्तीने ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥२-८०॥


याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. तो मग त्याला म्हणाला राजा, अर्जुन पुन्हा शोकाकूल होऊन काय म्हणाला ते ऐक. ॥२-८१॥


तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी खात्रीने ह्या वेळी लढणार नाही. ॥२-८२॥


असे एकदम बोलला. मग स्तब्ध होऊन बसला. त्याप्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. ॥२-८३॥


मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला, याप्रसंगी याने हे काय आरंभले आहे ? या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, याला काय करावे ? ॥२-८४॥


हा आता कशाने उमजेल ? कशाने धीर धरेल ? ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच कसे दूर होईल याचा विचार करतो ॥२-८५॥


किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्द्य अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोप योजना करतो ॥२-८६॥


त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करत होता. ॥२-८७॥


श्रीकृष्णाने तो हेतू मनात धरला व तो रागाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते ॥२-८८॥


किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते, ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने स्पष्ट होते. ॥२-८९॥


त्याप्रमाणे वर वर पहाता उदास (कठोर), पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले ॥२-९०॥


मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले – हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले. ॥२-९१॥


तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस, पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणापणाच्या गोष्टी सांगतोस. ॥२-९२॥


जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. ॥२-९३॥


तू स्वत:ला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल आम्हाला फारच विस्मय वाटतो. ॥२-९४॥


तर अर्जुना, सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय ? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय ? ॥२-९५॥


तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का उगीच ? ९६॥


तेव्हा आता असे झाले का की हे जन्ममृत्यु तू उत्पन्न केलेस ? आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का ? ॥२-९७॥


तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग बरे हे काय चिरंजीव होणार आहेत ? ॥२-९८॥


किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस. ॥२-९९॥


ही सगळी (सृष्टी) अनादिसिद्ध आपोआप होते व जाते. तर मग तू शोक का करावास ? सांग बरे. ॥२-१००॥


पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही. मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. ॥२-१०१॥


हे पहा जन्म, मृत्यु ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत नाहीत. ॥२-१०२॥


अर्जुना, सांगतो ऐक. पहा, येथे आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहो ॥२-१०३॥


ते आपण हल्ली आहो, असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुत: या दोन्ही गोष्टी खर्‍या नाहीत. ॥२-१०४॥


जन्म व मृत्यु हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तु (आत्मा) जी आहे ती अविनाशीच आहे. ॥२-१०५॥


वार्‍याने पाणी हलवले, त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म झाला असे म्हणता येईल ? ॥२-१०६॥


पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर. ॥२-१०७॥


आणखी असे पहा की, शरीर तर एकच आहे पण वयपरत्वे त्याच अनेक दशा प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा आहे. ॥२-१०८॥


याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, पण शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. ॥२-१०९॥


त्याचप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात, असे जो जाणतो त्याला भ्रांतिजन्य दु:ख कधीही होत नाही. ॥२-११०॥


असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिये अंत:करणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो. ॥२-१११॥


इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात. ॥२-११२॥


ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व काही थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते). ॥२-११३॥


पहा की निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात. ॥२-११४॥


मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात. ॥२-११५॥


पहा, भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात. ॥२-११६॥


सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात. ॥२-११७॥


त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. ॥२-११८॥


पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो. ॥२-११९॥


पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही. ॥२-१२०॥


हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो ॥२-१२१॥


तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस, ॥२-१२२॥


या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख-दु:ख ही दोन्ही नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. ॥२-१२३॥


जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही, तो पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. ॥२-१२४॥


आता अर्जुना मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. ॥२-१२५॥


या देहादी प्रपंचामधे सर्वत्र चैतन्य गुप्तरूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. ॥२-१२६॥


दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे ते निवडून वेगळे करतो ॥२-१२७॥


अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून घेतात ॥२-१२८॥


अथवा बुद्धिचातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते ॥२-१२९॥


किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफाणले असता धान्य जाग्यावर रहाते व उडून गेलेले ते फोलकट असे ज्याप्रमाणे समजून येते ॥२-१३०॥


त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निरास होतो (जो मिथ्या ठरतो) असा प्रपंच (देहादिउपाधी) ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व (ब्रह्म) मात्र उरते. ॥२-१३१॥


म्हणून ज्यांनी दोहोंमधील (उपाधी व चैतन्य) सार ओळखले त्यांची शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. ॥२-१३२॥


पहा सारासाराचा विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज व सार हे स्वभावत:च नित्य आहे असे जाण. ॥२-१३३॥


हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे किंवा लक्षणे नाहीत. ॥२-१३४॥


जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. ॥२-१३५॥


आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावत:च नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावे हे योग्य आहे. ॥२-१३६॥


तू देहाचा अभिमान धरून व या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन मारणारा व हे कौरव मरणारे आहेत असे म्हणत आहेस. ॥२-१३७॥


तरी अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वत: विचार करून पहाशील तर तू मारणारा नाहीस व हे मारले जातील असेही नाहीत. २-१३८॥


ज्याप्रमाणे जे स्वप्नात स्वप्न पहावे, ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते आणि मग जागे होऊन पहावे तर काही एक नसते. ॥२-१३९॥


त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ हिचा भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, ॥२-१४०॥


किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो ॥२-१४१॥


किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले असते पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळरूपाने रहाते ॥२-१४२॥


त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राणाच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही. म्हणून बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ॥२-१४३॥


आपण जुने वस्त्र टाकावे व मग नवीन धारण करावे त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. ॥२-१४४॥


हा आत्मा अनादी, नित्यसिद्ध (शाश्वत असणारा), उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही.॥२-१४५॥


हा आत्मा प्रलयकाळाच्या पाण्यानेही बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही. तेथे वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही. ॥२-१४६॥


हा आत्मा अर्जुना, तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर याच्या भेटीला उत्कंठित झालेले असते. ॥२-१४७॥


हा मनाला नेहेमी दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम परमात्मा अनंत आहे. ॥२-१४८॥


हा सत्वादी तीन गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. ॥२-१४९॥


अर्जुना, हा आत्मा नित्य स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहेमी भरलेला असा आहे. ॥२-१५०॥


अर्जुना, असा हा आहे असे लक्षात घे. हा सर्वव्यापी आहे हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक सहजच नाहीसा होईल. ॥२-१५१॥


अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी ।तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥

अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंतच आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला शोक करणे उचित नाही. ॥२-१५२॥


कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती स्थिती व नाश यांचा क्रम अखंड आहे. ॥२-१५३॥


ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, (त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते) व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वहात राहिलेले दिसते, ॥२-१५४॥


त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ही तिन्ही बरोबरच असतात, असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत. ॥२-१५५॥


म्हणून या सगळ्याबद्दल शोक करण्याचे तुला येथे कारण नाही. कारण मुळापासूनच स्वभवत: अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ॥२-१५६॥


अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या स्वाधीन आहे असे पाहून जरी हे (वरील म्हणणे) तुझ्या मनाला येत नसेल ॥२-१५७॥


तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण असे पहा की हे जन्ममृत्यु हे टाळता न येणारे आहेत. ॥२-१५८॥


जे उपजते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते. अर्जुना रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो. ॥२-१५९॥


अथवा उदय व अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जातात, त्याप्रमाणे जन्ममृत्यु हे जगात न चुकवता येणारे आहेत. ॥२-१६०॥


महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ति-नाश टळत नाही ॥२-१६१॥


असे हे जर तुला कबूल असेल तर मग खेद का करत आहेस ? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतोस ? ॥२-१६२॥


या ठिकाणी अर्जुना, आणखी एका तर्‍हने विचार करता येईल. पुष्कळ बाजूंनी पाहिले तरी तुला दु:ख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. ॥२-१६३॥


शकारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माला आल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ॥२-१६४॥


ते जेथे नाश होऊन जातात तेथे नि:संशय वेगळे असत नाहीत. पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. ॥२-१६५॥


आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त, साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे आहे. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ॥२-१६६॥


अथवा पाण्याला वार्‍याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते किंवा दुसर्‍याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो ॥२-१६७॥


त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली (मायेमुळे भासमान झाली) आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, ॥२-१६८॥


त्याप्रमाणे जे मुळात नाहीच त्याकरता तू का रडत बसला आहेस ? निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. ॥२-१६९॥


ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ (संताच्या ठिकाणी) उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात. जे विरक्त आहेत ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात. ॥२-१७०॥


त्याच्यावर नजर ठेऊन मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात ॥२-१७१॥


कित्येक स्थिर अंत:करणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पहाताच सर्व संसार विसरून जातात ॥२-१७२॥


कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. ॥२-१७३॥


कित्येक त्याचे रूपवर्णन ऐकूताच शांत होतात व त्यांची देहभवना सुटते. कित्येक त्याच्या अनुभवाने (साक्षात्काराने) तद्रूपता पावतात. ॥२-१७४॥


सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही. ॥२-१७५॥


त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन: देहतादात्म्यावर येत नाहीत. ॥२-१७६॥


जे सर्वत्र सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी चैतन्य तू लक्षात घे. ॥२-१७७॥


हे सर्व जग स्वभावत: उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर सांग, येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे ? ॥२-१७८॥


हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये, हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. ॥२-१७९॥


तू अजून ह्याचा का विचार करत नाहीस ? हे काय मनात घेऊन बसला आहेस ? ज्याच्या योगाने तरून जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. ॥२-१८०॥


या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा या वेळी युगांत जरी ओढवला ॥२-१८१॥


तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरून जाता येईल काय ? ॥२-१८२॥


अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. ॥२-१८३॥


अरे दूध जरी गाईचे असले, तरी ते पथ्यास घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितले असताही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विषवत् मारक होते. ॥२-१८४॥


त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो. एवढ्याकरता तू आता सावध हो. ॥२-१८५॥


तू विनाकारण शोकाकुल का होतोस ? ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावयाचा नाही त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. ॥२-१८६॥


ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही, किंवा दिव्याच्या आधाराने चालले असता ठेच लागत नाही ॥२-१८७॥


त्याप्रमाणे पार्था, स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पुर्‍या होतात. ॥२-१८८॥


म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. ॥२-१८९॥


मनात कपट न धरता, मार्‍याला मारा करून आवेशाने लढावे पण हे बोलणे असो. प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे ? ॥२-१९०॥


अर्जुना सांप्रतचे युद्ध पहा. हे कार्य म्हणजे जणु काय तुमचे दैवच फळले आहे. अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे उघडा झाला आहे. ॥२-१९१॥


याला काय युद्ध म्हणावे ? युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे. अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे. ॥२-१९२॥


अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्य़ास आली आहे. ॥२-१९३॥


क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते. ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पहावे तर तो चिंतामणी आढळावा ॥२-१९४॥


अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडावे व अकस्मात अमृत त्यात पडावे, त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे आलेले आहे असे समज. ॥२-१९५॥


आता असा हा संग्राम टाकून नाही त्या भलत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसलास तर असे करण्यात हे अर्जुना, आपणच आपले अकल्याण करून घेतो.॥२-१९६॥


आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल. ॥२-१९७॥


इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल, सगळे जग तुला नावे ठवील आणि महापातके तुला हुडकीत येऊन गाठातील. ॥२-१९८॥


ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याप्रमाणे स्वधर्मत्यागाने जीविताची तशी दशा होते. ॥२-१९९॥


अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहो बाजूंनी गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. ॥२-२००॥


म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही. ॥२-२०१॥


अपकीर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे येथून परत कसे फिरावे ? ॥२-२०२॥


तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही. ॥२-२०३॥


म्हणून हे चारही बाजूंनी तुला घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्याप्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. ॥२-२०४॥


जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच. ॥२-२०५॥


आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास ॥२-२०६॥


तर अर्जुना तुझे ते दयाळूपण या दुष्ट वैर्‍यांच्या मनाला खरे वाटेल का ? सांग बरे मला. ॥२-२०७॥


ते म्हणतील, हा पळाला रे पळाला. अर्जुन आम्हाला भ्याला. असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का ? सांग बरं. ॥२-२०८॥


लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण अर्जुना कीर्ती वाढवतात. ॥२-२०९॥


ती तुला अनायासे पुरी लाभली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे ॥२-२१०॥


त्याप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझ्या ठिकाणी उत्तम कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. ॥२-२११॥


देशोदेशीचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात. ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते. ॥२-२१२॥


अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगातील मी मी म्हणणारे वीर चकित होतात. ॥२-२१३॥


तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे ॥२-२१४॥


ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रळयकाळ होतो त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे. ॥२-२१५॥


ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला मानतात. ॥२-२१६॥


जर तू न लढताच परत निघशील तर तुझे ते महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हीनपणा येईल. ॥२-२१७॥


आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत, तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असतांना तुझी अमर्याद निंदा करतील. ॥२-२१८॥


मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये ? ह्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. ॥२-२१९॥


अथवा या समरांगणावर युद्ध करतांना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल. ॥२-२२०॥


एवढ्याकरता हे अर्जुना, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस. आता हे धनुष्य घेऊन ऊठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. ॥२-२२१॥


पहा, या स्वधर्माचे आचारण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला ? ॥२-२२२॥


अर्जुना सांग, होडीने कोणी बुडेल का ? किंवा चांगल्या वाटेने जातांना ठेच लागेल का ? पण कदाचित चालताच येत नसेल तर तेही होईल. ॥२-२२३॥


दूधच पण जर विषासह सेवन केले तर त्या दुधानेही मरण येईल, त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. ॥२-२२४॥


म्हणून पार्था, फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर. म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही. ॥२-२२५॥


सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दु:खाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानि मनात धरू नये. ॥२-२२६॥


या युद्धामधे जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल, या पुढच्या गोष्टींचा अगोदरच विचार करत बसू नये. ॥२-२२७॥


आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण, तेच करीत असतांना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. ॥२-२२८॥


अशी मनाची तयारी होईल तर सहजच पाप घडणार नाही. म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस भे योग्य आहे. ॥२-२२९॥


येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतो, तो तू ऐक. ॥२-२३०॥


अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मायोगातील बुद्धी मुळीच बाधत नाही. ॥२-२३१॥


ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नाही तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्श न होताच विजयी होऊन रहाता येते ॥२-२३२॥


त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच, पण मोक्षाचीही प्राप्ती होते. ॥२-२३३॥


कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणाणार्‍याला भुताची बाधा होत नाही ॥२-२३४॥


त्याप्रमाणे सुबुद्धी (अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी) एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणाजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. ॥२-२३५॥


ज्या बुद्धीत पुण्य-पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी (विचाराने) सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो ॥२-२३६॥


अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल. ॥२-२३७॥


ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी, पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे ह्या सुबुद्धीला लहान म्हणता येत नाही. ॥२-२३८॥


अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ॥२-२३९॥


ज्याप्रमाणे इतर वस्तु हव्या तितक्या मिळतात, पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो. ॥२-२४०॥


अमृत जसे दुर्लभ त्याचप्रमाणे परमात्मा हाच जिचा शेवट (अंतिम ध्येय) आहे, ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्या प्रमाणे समुद्रावाचून निखलास अन्य गती नाही ॥२-२४१॥


त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून अन्य आश्रयस्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. पहा. ॥२-२४२॥


ह्याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहेमी आसक्त होतात. ॥२-२४३॥


म्हणून पार्था, त्यांना (दुर्बुद्धीयुक्तांना) स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात. पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. ॥२-२४४॥


वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलांचा लोभ धरतात ॥२-२४५॥


ते म्हणतात, मृत्युलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. ॥२-२४६॥


यावाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादन करतात. अर्जुना पहा. ॥२-२४७॥


पहा केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरतात. ॥२-२४८॥


अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात. ॥२-२४९॥


परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात. ॥२-२५०॥


ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे ॥२-२५१॥


किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात. ॥२-२५२॥


मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी ? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे ? ॥२-२५३॥


ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्य़ाप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. ॥२-२५४॥


म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव. ॥२-२५५॥


तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत. ॥२-२५६॥


आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. ॥२-२५७॥


म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस. ॥२-२५८॥


तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. ॥२-२५९॥


जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचवले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. ॥२-२६०॥


ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जावयाचे ? सांग बरे मला. ॥२-२६१॥


किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. ॥२-२६२॥


त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचेच ग्रहण करतात. ॥२-२६३॥


म्हणून अर्जुना, ऐक. याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे. ॥२-२६४॥


आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. ॥२-२६५॥


परंतु कर्मफालाच्या ठिकाणी आशा ठेऊ नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ति होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. ॥२-२६६॥


अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफालाचा अभिलाष टाकून मग मन:पूर्वक विहित कर्मे करावीस. ॥२-२६७॥


परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष काही संतोष मानावा हेही नको. ॥२-२६८॥


किंवा काही कारणामुळे ते आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसेच अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. ॥२-२६९॥


हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले कामच झाले. पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. ॥२-२७०॥


कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज. ॥२-२७१॥


आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती आहे. (निष्काम कर्मयोग). तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात. ॥२-२७२॥


अर्जुना, (यशापयशी) चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. (मनाचा संकप व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो). ॥२-२७३॥


पार्था बुद्धियोगाचा (निष्काम कर्मयोगाचा) विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमीप्रतीचा दिसतो. ॥२-२७४॥


परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे ह्या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे की करता करता सकामकर्मातून कर्तृत्वमद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेषकर्म ती सहजच योगस्थिती होय. ॥२-२७५॥


म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. ॥२-२७६॥


जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसारसागराच्या पलिकडे जातात, त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून सुटका होते. ॥२-२७७॥


ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतातच पण कर्मफलाला मनाने शिवतही नाहीत. म्हणून अर्जुना जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. ॥२-२७८॥


अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. ॥२-२७९॥


अर्जुना ज्यावेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू असा वरीलप्रमाणे होशील. ॥२-२८०॥


मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरिच्छ होईल ॥२-२८१॥


तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवलेले आहे ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना, केवळ जागच्या जागीच राहील. ॥२-२८२॥


इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फाकते म्हणजेच चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल ॥२-२८३॥


मग केवळ समाधीच्या सुखात (शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी) ज्यावेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. ॥२-२८४॥


त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच अभिप्राय मी आता विचारतो, हे करुणासागरा श्रीकृष्णा तो तू सांग. ॥२-२८५॥


मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. ॥२-२८६॥


या बोलण्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे सांग बर. ॥२-२८७॥


आणि ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात व जो समाधिसुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे ? ॥२-२८८॥


तो कोणत्या स्थितीत असतो ? कोणत्या प्रकारे वागतो ? हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा, मला सांगावे. ॥२-२८९॥


तेव्हा ऐश्वर्यादी सहा गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला श्रीकृष्ण काय बोलता झाला ते ऐका. ॥२-२९०॥


श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ऐक मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. ॥२-२९१॥


जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंत:करण नेहेमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमधे पतन होते ॥२-२९२॥


तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न रहाते तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. ॥२-२९३॥


कितीही दु:खे प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही ॥२-२९४॥


अर्जुना, त्याचे ठिकाणी स्वभावत:च कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते. असा तो परिपूर्ण होय. ॥२-२९५॥


असा जो अमर्याद आहे व जो (देहप्रपंचादी) उपाधि सोडून भेदरहित झालेला असतो तो स्थिरबुद्धी होय असे समज. ॥२-२९६॥


परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देतांना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सर्वत्र सारखा, समबुद्धीने वागतो ॥२-२९७॥


ज्याच्या ठिकाणी अशी निरंतर समता व भूतमात्रांविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही ॥२-२९८॥


काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणार्‍या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही ॥२-२९९॥


याप्रमाणे जो हर्षशोकरहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिरबुद्धी होय असे अर्जुना जाण. ॥२-३००॥


किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असतांना आपले अवयव पसरते किंवा मनास वाटल्यास आपल्या आपण आवरून धरते ॥२-३०१॥


त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. ॥२-३०२॥


अर्जुना आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, ॥२-३०३॥


जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात, पण जिभेला आळा घालत नाहीत त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. ॥२-३०४॥


ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरची पालवी वरवर खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार ? ॥२-३०५॥


ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारत जाते त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने विषयवासना मनात पोसतात. ॥२-३०६॥


ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे रस, खाणे पिणे हा जिभेचा विषय निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्यावाचून जगणेच व्हावयाचे नाही. ॥२-३०७॥


पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो तेव्हा त्याला अशाही रसनेचे सहजच नियमन करता येते. ॥२-३०८॥


ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. ॥२-३०९॥


एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून नेहेमी जपून वागतात ॥२-३१०॥


जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे (मनाला) कुंपण घालतात व जे मनाला नेहेमी मुठीत धरून असतात ॥२-३११॥


त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते, ॥२-३१२॥


त्याप्रमाणे पहा, हे विषय ऋद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारा साधकाला ग्रासून टकतात. ॥२-३१३॥


अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगु होऊन रहाते. (त्याचा अभ्यास जागच्या जागीच रहातो). इंद्रियांचा जोर हा असा आहे. ॥२-३१४॥


म्हणून अर्जुना, ऐक. सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे सर्वस्वी दमन करतो, ॥२-३१५॥


ज्याचे अंत:करण विषयसुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे, असे तू समज. ॥२-३१६॥


तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे त्याला माझे परमात्म्याचेसुद्धा अंत:करणातून विस्मरण होत नाही. ॥२-३१७॥


एरवी एखाद्याने बाह्यत: विषयांचा त्याग केला पण मनात जर काही विषयवासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. ॥२-३१८॥


ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग नि:संशय प्राणाची हानी करतो ॥२-३१९॥


त्याचप्रमाणे पहा, या विषयांची नुसती शंका (सूक्ष्म संस्कार) जरी मनात राहिली तरी ती संपूर्ण विचारमात्राचा घात करते. ॥२-३२०॥


अंत:करणात विषयांची नुसती जर आठवण असेल तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते. व त्या विषयासक्तीमुळे विषयप्रीतीची इच्छा निर्माण होते. ॥२-३२१॥


जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. ॥२-३२२॥


ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृति नाश पावते. ॥२-३२३॥


किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृति नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते. ॥२-३२४॥


मग सर्वत्र अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. ॥२-३२५॥


जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरा वैरा धावू लागतो तसे अर्जुना, बुद्धीला मग भ्रमण होते. ॥२-३२६॥


अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला की बुद्धीची सर्वप्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. ॥२-३२७॥


प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते असे समज. ॥२-३२८॥


म्हणून अर्जुना ऐक. लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते ॥२-३२९॥


त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधीत येते. ॥२-३३०॥


म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग रागद्वेष (आवडनावड) आपोआप नष्ट होतील. ॥२-३३१॥


अर्जुना, आणखी एक गोष्ट ऐक. रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी (ते विषय) बाधक होत नाहीत. ॥२-३३२॥


ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय ? ॥२-३३३॥


त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो ॥२-३३४॥


आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपावाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय ? आणि कसली कोणाला बाधा करणार ? ॥२-३३५॥


जर पाणी पाण्यात बुडेल, किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. ॥२-३३६॥


असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन रहातो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू नि:संशय मान. ॥२-३३७॥


पहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथे कोणत्याही संसारदु:खाचा प्रवेश होत नाही. ॥२-३३८॥


ज्या प्रमाणे अमृताचा झराच ज्याच्या पोटात उत्पन्न होतो त्याला तहानभुकेची भीती कधीच नसते. ॥२-३३९॥


त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाले तर मग दु:ख कसले आणि कोठले ? त्यावेळी परमात्मस्वरूपाचे ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ॥२-३४०॥


ज्याप्रमाणे निवार्‍याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ॥२-३४१॥


योगयुक्त होऊन रहाण्याचा हा विचार ज्याच्या अंत:करणात नाही, त्याला शब्दादि विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. ॥२-३४२॥


अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर अशी केव्हाच होत नाही. आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. ॥२-३४३॥


आणि पहा, निश्चलत्वाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? ॥२-३४४॥


ज्याप्रमाणे पापी मनुष्याचे ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकत नाही. ॥२-३४५॥


पहा विस्तवात घातलेले बी जर उगवेल तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. ॥२-३४६॥


म्हणून मनाची चंचलता हेच दु:खाचे सार आहे, याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले. ॥२-३४७॥


ही इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. ॥२-३४८॥


ज्याप्रमाणे नाव तीरावर येउन लागल्यावरही जर वादळात सापडली तर ज्या अपायाला ती चुकवून आली तोच अपाय तोच अपाय तिला मागून पोचतो. ॥२-३४९॥


त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे लाड केले तर तो देखिल पुन: संसार-दुखाने व्यापला जातो, पहा. ॥२-३५०॥


म्हणून आपल्याला आपली इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना, दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय ? ॥२-३५१॥


पहा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असतांना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आखडून घेते, ॥२-३५२॥


त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज. ॥२-३५३॥


आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो ऐक. ॥२-३५४॥


पहा, सर्व प्राणिमात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले (अज्ञानी) असतात त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते (म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते) आणि जीव ज्या (देहादी प्रपंचाच्या) ठिकाणी जागे (विषयसुख अनुभवणारे असतात) त्या ठिकाणी जो निजलेला असतो (विषयांपासून निवृत्त असतो) ॥२-३५५॥


तोच खरा निरुपाधि होय. अर्जुना, त्याचीच बुद्धि स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. ॥२-३५६॥


अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. तो प्रकार ऐक. पहा, जशी समुद्रात निरंतर शांतता असते ॥२-३५७॥


सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून (त्या समुद्राला) मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडत नाही. ॥२-३५८॥


किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यामुळे जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना, समुद्र मुळीच ओसरत नाही. ॥२-३५९॥


त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झालेल्या असताही ज्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही. ॥२-३६०॥


सांग बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का ? आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून ठेवता येईल का ? ॥२-३६१॥


पहा त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि आल्या की गेल्या, याचे त्याला भानही नसते. तो अंत:करणाने महासुखात निमग्न असतो. ॥२-३६२॥


जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो, तो भिल्लाच्या पालांच्या खोपटावर कसा खूष होईल ? ॥२-३६३॥


जो अमृताला नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो ऋद्धीचा भोग घेत नाही. ॥२-३६४॥


अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा, जेथे स्वर्गसुखाची खिजगणती नाही, तेथे बापड्या ऋद्धिसिद्धीचा काय पाड ? ॥२-३६५॥


असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धी आहे. असे तू समज. ॥२-३६६॥


तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो. ॥२-३६७॥


ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासे परब्रह्माला पोचतात. ॥२-३६८॥


कारण की चिद्रूपी म्हणजेच ज्ञानस्वरूपी मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही ॥२-३६९॥


तीच ही स्थिती, श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. ॥२-३७०॥


शअसे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले. ॥२-३७१॥


कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले. तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबेल. ॥२-३७२॥


श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील ॥२-३७३॥


तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. जणु काय तो सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. ॥२-३७४॥


सर्वज्ञ जो श्रीकृष्ण तोच स्वत: जे निरूपण करील ती हकिकत निवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. ॥२-३७५॥


इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥