ग्रंथ ,संत एकनाथ महाराज-चिरंजीवपद अर्थासहित

“चिरंजीवपद” म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।।


यात मुख्यतः ‘अनुताप’ (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।।


sant-eknath-maharaj-chiranjivpad-arthasahit

तो म्हणतो, देवाने हा उत्कृष्ट नरदेह दिला असता विषय सेवनाकडे मी त्याचा दुरुपयोग केला आणि हातचा परमार्थ घालवून बसलो.
असा तो विचार करतो. ।।३।।


असा अनुताप नित्य करू लागला म्हणजे त्यास ‘वैराग्य’ प्राप्त होते. त्या वैराग्याची कथा (स्वरूप) सांगतो, ऐक. ।।४।।


ते वैराग्य अनेक प्रकारचे असते, त्यात योगीश्वरांनी (सर्व श्रेष्ठ अनुभव जाणकारांनी) सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकार सांगितले आहेत. ।।५।।


वेधविधी, आचार-विचार, सत्कर्म इत्यादी ज्याला माहीत नाही. कर्मधर्मात जो भ्रष्टाचार करतो, तो पुरुष ते वैराग्य ‘तामस’ म्हणजे अपवित्र होय. ।।६।।


लोकांनी आपल्या नादी लागून पूजा करावी ह्या हेतूने (बाह्यतः) त्याग करणे व सत्संग सोडून पूजा घेणे, आणि (शिष्यांकरिता आपलेपणा)धरून राहणे. हे ‘राजस’ वैराग्य समजावे. ।।७।।


असले राजस व तामस वैराग्य संतांना मान्य नाही. कारण त्यायोगे श्रीकृष्ण परमात्मा भेटत नाही. उलट ते अनार्थस कारण होते. ।।८।।


आता शुद्ध सात्विक वैराग्य, जे मी यदुनायक जगतवंद्य मानतो. ते सविस्तर सांगतो. मनास नीट ठसण्याकरिता लक्ष देऊन ऐक. ।।९।।


विषयाची सर्व भोगेच्छा तो टाकून देतो. प्रारब्धानुसार भोग प्राप्त झाले तरी त्यातून अंग काढून घेतो. (लिप्त होऊन राहत नाही). ।।१०।।


कारण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाच विषय आहेत, ते साधकांना नाडतात, म्हणून त्याची प्रीती तो लावून घेत नाही. ते कसे ते सांगतो ऐक. ।।११।।



विरक्त पुरुष पाहून लोक त्याची स्तुती करू लागतात, कोणी त्याला मोठ्या सन्मानाने पूजेसाठी नेतात. ।।१३।।


त्याचे वैराग्य कोवळ्या काट्या सारखे लवचिक असल्यामुळे नेट धरू शकत नाही, अलौकिक मान व स्तुती पाहून तो तेथे भुलून जातो. ।।१४।।


जगद्उद्धाराकरीता हा हरीचा अवतार असून आमच्याकरिता येथे स्थिर झाला आहे. इत्यादीजण स्तुतीचे शब्द त्याला गोड वाटू लागतात, त्यायोगे तो ‘शब्द’ गोडी धरतो. (ते गोड लागतात म्हणून तो अडकतो.) ।।१५।।


पाच विषयामध्ये ‘शब्द’ हा पहिला विषय होय, त्या नंतर स्पर्श विषय त्याला सुगम होतो तो उपक्रम ऎक. ।।१६।।


बसायला लोड,तक्के,
गाद्या वगैरे मऊ आसने घालतात,
निजायला छप्पर पलंग वगैरे देतात आणि नरनारी शुश्रूषा सेवा करायला लागतात,
त्यायोगे तो ‘स्पर्श’ गोडी धरतो. ।।१७।।


आता ‘रूप’ विषय कसा गोवतो ते पहा.
त्याला चांगली चांगली वस्त्र व अलंकार देतात.
त्यायोगे देहाच्या सौंदर्यात तो गुरफटतो.
देहभावात श्लाघ्यता (मोठेपणा, डौल, थोरवी) मानतो.
यामुळे देहाबद्दल मोठेपणा उत्पन्न होतो व वाढतो. ।।१८।।


या प्रमाणे ‘रूप’ विषय त्याला जडतो.
त्यानंतर ‘रस’ विषय कसा झोम्बतो पहा.
जे जे खाणे आवडते,
तसले पदार्थ त्याला खावयाला देतात. ।।१९।।


त्या रसगोडीमुळे तो त्या भक्तांना घडीभरही न विसंबत त्यांची ममता धरून राहतो ! त्यानंतर ‘गंध’ विषय त्याला कसा ओढतो ते पहा. ।।२०।।


त्याला अत्तर, गुलाब, बुका, केशराची उटी इत्यादी लावतात. याप्रमाणे पाचही विषय सन्मानाने जडून राहतात.! ते सन्मानाने (मिळतात) त्यांचे बरोबर मानही मिळतो. ।।२१।।


असे झाले म्हणजे पूर्वी जे जे लोक वंदन करीत असत,
ते ते नंतर निंदा करू लागतात !
परंतु चित्तात अनुताप उत्पन्न होत नाही,
कारण त्याला पूजकाची ममता लागून राहिलेली असते. ।।२२।।


कोणी म्हणतील, जो विवेकी असतो त्याला जनमान( लोकांकडून मिळणारा मोठेपणा) कसा बाधा करील? परंतु हे बोलणे मूर्खाचे होय, ज्याला मानाची गोडी असते. (तोच असे म्हणेल.) ।।२३।।


ज्ञात्याला (विवेकी पुरुषाला) प्रारब्ध गतीने मान प्राप्त झाला तरी (देणार्याच्या संतोषाकरिता) नको म्हणत नाहीत, परंतु त्यातच ते गुंतून राहत नाही, लगेच उदास होतात. ।।२४।।


याप्रमाणे साधकाच्या चित्ताला मानाची गोडी सोडवत नाही. भगवंताला कृपा उत्पन्न होईल, तरच तो पुन्हा विरक्त होईल. ।।२५।।


तो विरक्त कसा वागतो म्हणाल, तर जिकडे मान-पान होतो, ते ठिकाण सोडून मनाची तळमळ टाकून देऊन तो सत्संगात राहू लागतो. ।।२६।।



अभिमान उत्पन्न होईल या भीतीने तो स्वतंत्र फड म्हणजे संप्रदाय उभारीत नाही ! उपजीविकेची इच्छा धरून लोकांची मनधरणी करण्याकरिता तो गोड बोलत नाही. ।।२८।।


त्याला प्रपंची लोकांत बसणे आवडत नाही, त्याला लोकांचे बोलणे रुचत नाही, आपली योग्यता मिरवावी असे त्याला वाटत नाही, किंवा गोड गोड खानेही आवडत नाही. ।।२९।।


इतर लोकांसारखी चांगले चांगले कपडे, दागिने त्याला आवडत नाही, पंचपक्वनांची गोडी व धन जोडीही त्याला आवडत नाही. ।।३०।।


स्रियांमध्ये बसणे आवडत नाही, स्रियांकडे पाहणे आवडत नाही, स्रियांकडून पाय वैगरे चेपून (रगडणे) घेणे आवडत नाही किंवा त्यांच्याकडे त्याला बोलणेही आवडत नाही. ।।३१।।


नको नको ती स्त्रीयांची संगत, नको नको स्त्रीयांचा एकांत, नको नको स्त्रीयांचा परमार्थ, कारण तो पुरुषाला बाधकच होतो. ।।३२।।


हे ऐकून, कोणी म्हणतील, की गृहस्थाश्रमी साधकाने स्त्रीला सोडून द्यावी की काय? ह्या बद्दलचे उत्तर सांगतो ते नीट ऐकावे. ।।३३।।


तशा गृहस्थ साधकाने आपल्या स्त्री वाचून इतर स्रियांना स्पर्श करू नये, इतर स्रियांना आपल्याजवळ बोलण्याचीही संधी देऊ नये. ।।३४।।


स्वस्त्रीकडे सुद्धा कामपूरतेच बोलावे व शिवावे,
पण मनाने तिच्याकडे बिलकुल आसक्त होऊन राहू नये. ।।३५।।


स्त्रीपुरुष मंडळी सुश्रुषा करितात, भक्ती ममता उपजवितात, परंतु जो खराखुरा पारमार्थि असतो तो स्रियांच्या संगतीत बसत नाही. ।।३६।।


तो अखंड एकांतात बसतो, तरुण स्रियांच्या संगतीस राहत नाही, निःसंग व निरभिमान अशा पुरुषांच्या जवळच बसत व वसत (राहत) असतो. ।।३७।।


कुटुंबाच्या निर्वाहाकरिता अकल्पित काही न मिळाले, तर कोरान्न (कोरडी) भिक्षा मागावयाची, अशा स्थितिने वर्तन करणे, हेच शुद्ध वैराग्य समजावे. ।।३८।।


अशी स्थिती जोपर्यंत साधणार नाही, तो पर्यंत त्याला श्रीकृष्ण प्राप्ती कशी होणार ? ह्या करिता श्रीकृष्णभक्ताला अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. ।।३९।।


अशी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय जो श्रीकृष्ण स्वरूपात मिळून जाऊ म्हणे, तो अज्ञान व मूर्खाचा शिरोमणी समजावा ! हे खोटे वाटेल तर देवाची शपथ घेऊन हे मी सांगत आहे. ।।४०।।


हे बोलणे खरोखर माझ्या मतीचे नव्हे, श्रीकृष्णाने उद्धवाला जो हिताचा उपदेश केला आहे तोच मी सांगितला आहे. ।।४१।।


हे ज्याच्या मनाला खरे वाटणार नाही, तो विकल्पामुळे श्रीकृष्णचरणाकडे पोचणार नाही. यात माझे काय जाईल? मी तर सांगून उतराई होत आहे. ।।४२।।


वैराग्य व ज्ञान साध्य करून घेण्याकरिता मनुष्य देहात येऊन वर सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केला पाहिजे, त्या शिवाय दुसरा उपाय नाही, असे श्रीजनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज सांगत आहेत. ।।४३।।

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥