ghorakashtodharan-stotra
|| घोरकष्टोद्धरण स्तोत्र ||
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥
श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्
।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।

सार्थ घोरकष्टोद्धारणस्तोत्र विवरण
‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावातच या स्तोत्राचे मर्म सामावले आहे. ‘घोर + कष्ट + उद्धार’ असे याचे विश्लेषण केल्यास, मानवी जन्म हा पाप आणि पुण्य यांच्या संमिश्रणातून निर्माण होतो हे लक्षात येते. अशा मानवी जन्मात, जन्म-मृत्यूच्या चक्रात सतत भ्रमण करताना उद्भवणाऱ्या तीव्र दुःखाची जाणीव आणि त्यातून मुक्त होण्याची असमर्थता यामुळे जीवाची होणारी तळमळ पाहून, परम करुणावान परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या स्तोत्राची रचना केली आहे.
या दृष्टिकोनातून या स्तोत्राचे फलश्रुती प्रथम समजून घेऊ:
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं |
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं |
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ५ ||
श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या या स्तोत्राच्या नियमित पठनाने सद्धर्माविषयी प्रेम, सत्बुद्धी, दैवी भक्ती आणि सत्संगाची प्राप्ती होते. यामुळे या देहातच भौतिक आणि पारलौकिक सर्व इच्छांची पूर्तता होऊन, अंतिमतः मोक्ष हा चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त होतो. यापुढे जाऊन, “भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते” अर्थात श्रीदत्तात्रेयांच्या आनंदमयी स्वरूपाची भक्ती, म्हणजेच पंचम पुरुषार्थ, निश्चितपणे मिळतो. यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते.
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||
या पाच श्लोकांचे नित्य पठन करणाऱ्या भक्ताचे सर्व प्रकारे कल्याण होते. असा अनन्य भक्त श्रीदत्तात्रेयांना अत्यंत प्रिय होतो.
आता थोडक्यात श्लोकांचा अर्थ पाहू:
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |
श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||
हे परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभा, देवांमध्ये श्रेष्ठ दत्तगुरू, मी तुमच्या शरणाला आलो आहे. माझा भाव ग्रहण करून माझे सर्व दुःख हरण करा आणि या तीव्र संकटातून माझा उद्धार करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.
त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं |
त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||
हे विश्वस्वरूपी प्रभो, तुम्हीच माझे माता, पिता, बंधू आणि रक्षक आहात. तुम्हीच माझे योग आणि क्षेम सांभाळता. तुम्हीच माझे सर्वस्व आहात. कृपया या संसाररूपी भवसागरातील घोर संकटातून माझी सुटका करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.
पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम |
भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||
हे दत्तगुरू, तुम्ही माझे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध ताप दूर करा. माझ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी, दैन्य आणि भय यांचा नाश करा. या कलीयुगातील घोर संकटातून माझा उद्धार करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |
त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||
हे अत्रिनंदन, तुम्हीविना मला अन्य कोणी रक्षक, दाता किंवा पालनकर्ता नाही. शरणागताची उपेक्षा न करणारे तुम्हीच खरे देव आहात. कृपया तुमच्या पूर्ण कृपेने या घोर संकटातून माझा उद्धार करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् |
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् |
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ५ ||
हे आनंदमयी दत्तगुरू, मला सर्व कष्टांतून मुक्त करा, जेणेकरून मला धर्माप्रती प्रेम, सत्बुद्धी, भक्ती आणि सत्संग मिळेल. यामुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन, मला भक्ती आणि मोक्ष प्राप्त होईल. पहिल्या चार श्लोकांतून व्यावहारिक संकटांतून मुक्तीची प्रार्थना आहे, कारण सामान्य माणूस संसारातून मुक्त न झाल्यास परमार्थाकडे लक्ष देऊ शकत नाही.
इति श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्र सम्पूर्णम् ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||
घोरकष्टोद्धारणस्तोत्राचा परिचय
परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी रचलेले घोरकष्टोद्धारणस्तोत्र हे संकटांचे निवारण आणि गुरुग्रह पीडेची शांती करण्यासाठी अत्यंत प्रभावी दत्तस्तोत्र आहे.
शके १८३३ (इ. स. १९१, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास श्रीक्षेत्र कुरवपूर (कुरुगड्डी) येथे संपन्न झाला. यावेळी कोल्हापूरचे श्री. शेषराव कारदगेकर आपल्या कुटुंबासह स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांना संतती नव्हती आणि त्यांच्यावर कर्जाचा बोजाही होता. स्वामी महाराजांवर त्यांची अटळ श्रद्धा होती. त्यांनी विचार केला, “आपली दुःखे जर आपल्या गुरुदेवांना सांगितली नाहीत, तर कोणाला सांगायची?” यामुळे त्यांनी आपल्या संतती आणि कर्जाच्या समस्येबद्दल स्वामी महाराजांना सांगितले.
स्वामी महाराजांनी त्यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ ठेवला आणि संततीप्राप्ती तसेच कर्जमुक्तीचा आशीर्वाद दिला. त्यांच्या आशीर्वादाने शेषराव यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली, तसेच त्यांचे कर्जही फिटले. शेषराव यांच्या विनंतीनुसार स्वामी महाराजांनी त्यांना वेंकटरमण हे नाव दिले होते.
आपल्या सर्व समस्यांचे निराकरण झाल्यावर, शेषराव यांना वाटले की, ज्याप्रमाणे आपले दुःख दूर झाले, त्याचप्रमाणे सर्वांचे कष्ट नष्ट व्हावेत आणि सर्वांना सुख आणि मंगल प्राप्त व्हावे. यासाठी त्यांनी स्वामी महाराजांना विनंती केली की, “माझ्याप्रमाणे सर्वांच्या संकटांचे निवारण व्हावे यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एक स्तोत्र सर्वांसाठी रचावे.” या प्रार्थनेला मान देऊन स्वामी महाराजांनी “घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र” रचले आणि ते शेषराव यांना अर्पण केले.
श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडी येथे हे स्तोत्र रोज पठन केले जाते. अनेक भक्तांना या स्तोत्राच्या पठनाचा चमत्कारिक अनुभव आला आहे आणि येत आहे. काही भक्त तर रोज १०८ वेळा या स्तोत्राचा पाठ करतात आणि त्यांना ऐहिक तसेच पारलौकिक कल्याण प्राप्त झाले आहे. खरोखर, श्री. शेषराव कारदगेकर यांचे आपणा सर्वांवर मोठे उपकार आहेत, कारण त्यांच्या प्रेरणेमुळे हे अलौकिक स्तोत्र आपल्याला प्राप्त झाले.