ज्या व्यक्तीच्या मनगटात सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि कुशलता आहे, तोच स्वतःच्या कर्तृत्वाने प्रजेच्या हृदयात स्थान मिळवून लोकप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा बनू शकतो. असा प्रेरणादायी संदेश देणाऱ्या आणि भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी नाव कोरणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्याने समाजाला नवी दिशा दिली.

सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यतेचे निर्मूलन, सामाजिक एकता, स्त्री-पुरुष समानता, गरीब-दुबळ्यांविषयी करुणा, हुंडा प्रथेचे उच्चाटन, अनिष्ट रूढी-परंपरांचा नाश, मूल दत्तक घेण्याचा वारसा आणि प्रजेच्या कल्याणासाठी सतत तळमळ यासारख्या अनेक समाजसुधारणांचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात, धनगर समाजातील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी झाला.

माणकोजी शिंदे हे सामान्य आर्थिक परिस्थितीचे असले तरी अत्यंत विद्वान, दूरदृष्टीचे आणि प्रगल्भ विचारांचे गृहस्थ होते. अठराव्या शतकात, जेव्हा शिक्षणाची साधने अत्यंत मर्यादित होती, तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला, अहिल्येला, घरीच शिक्षणाची व्यवस्था करून दिली. त्यांनी तिच्या बौद्धिक आणि नैतिक विकासावर विशेष लक्ष दिले, ज्यामुळे अहिल्याबाईंच्या जीवनाला एक भक्कम पाया मिळाला.

त्यांच्या या प्रयत्नांचा अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. अवघ्या आठव्या वर्षी, २० मे १७३३ रोजी, पुण्यातील शनिवारवाड्यावर होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकर यांचा एकुलता एक शूरवीर मुलगा, बाराव्या वर्षी असलेला खंडेराव, याच्याशी अहिल्याबाईंचा विवाह संपन्न झाला.

विवाहानंतर अहिल्याबाईंनी आपल्या चतुर, संयमी आणि शांत स्वभावाने होळकर कुटुंबातील प्रत्येकाचे मन जिंकले. त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. मल्हारराव होळकर यांनी दूरदृष्टी ठेवून, त्या काळातील पुरुषप्रधान संस्कृतीच्या मर्यादांना झुगारून, आपल्या सूनेचे शिक्षण आणि प्रशिक्षण यावर विशेष लक्ष दिले. त्यांनी अहिल्याबाईंना मोडी लिपीत मराठी लिहिणे-वाचणे, गणित, घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे, युद्धनीती, राजकारणाचे डावपेच, पत्रव्यवहार आणि न्यायनिवाडा यासारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

या सर्व शिक्षणामुळे अहिल्याबाईंची सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय बुद्धिमत्ता प्रगल्भ झाली. त्यांच्या या सर्वसमावेशक प्रशिक्षणाने त्यांना एक कुशल प्रशासक आणि समाजसुधारक बनण्यास मदत केली, ज्यामुळे त्यांनी पुढील काळात आपल्या कार्याने इतिहासात अजरामर स्थान मिळवले.

ahilyabai-holkar

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या युद्धात अहिल्याबाईंचे शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले असताना, त्या काळातील रूढींनुसार सती जाण्याचा प्रघात असतानाही अहिल्याबाईंनी तो नाकारला आणि पुरोगामी विचारांचा आदर्श घालून दिला. सती न गेल्याने समाजाकडून टीका, निंदा आणि चारित्र्यावर शंका उपस्थित होण्याची भीती असूनही, त्यांनी अत्यंत धैर्याने हा निर्णय घेतला.

“सती गेल्याने स्वर्ग मिळेल की नाही, हे कोण जाणे; परंतु जिवंत राहिल्यास लाखो प्रजाजनांना सुख, समृद्धी आणि न्याय देऊ शकेन,” असा विचार करून त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी जगण्याचा मार्ग निवडला. धर्म, रूढी आणि परंपरांच्या पलीकडे जाऊन कर्तव्याला प्राधान्य देत, त्यांनी प्रजेला कल्याणकारी आणि न्यायी राज्य दिले.

मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर (२० मे १७६६) आणि त्यानंतर मुलगा मालेराव यांच्या निधनाने (२७ मार्च १७६७) एकामागून एक दुःखांचा डोंगर कोसळला. तरीही, अहिल्याबाईंनी धैर्य आणि संयमाने परिस्थितीचा सामना केला. पुढील २९ वर्षे त्यांनी इंदोर संस्थानाचे यशस्वी नेतृत्व केले आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारी योजनांचा आदर्श निर्माण केला.

धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित त्यांचे राज्यकारभार समाजासाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून प्रजेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी अथक परिश्रम केले.

पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्याचा आणि संपत्तीचा लोभ सुटला. त्यांनी पन्नास हजार सैन्य घेऊन इंदोरवर चढाई केली आणि होळकरांचे राज्य पेशवाईत विलीन करण्याचा कुटिल डाव आखला. ही बातमी कळताच अहिल्याबाई खचल्या नाहीत. त्यांनी रघुनाथरावांना थेट खलिता पाठवला आणि निर्भयपणे लिहिले, “तुम्ही माझे राज्य हिरावण्याचा कपट रचला आणि माझ्या विश्वासघातकांना हाताशी धरले. मला दुबळी किंवा मूर्ख समजलात का? दुःखात असलेल्याला आणखी खोल बुडवण्याचा तुमचा हा दुष्ट हेतू आहे का?

आता तुमची आणि माझी गाठ रणांगणात होईल. माझ्यासोबत युद्धकुशल स्त्रियांचे सैन्य असेल. मी हरले, तर माझी कीर्ती अमर होईल; पण तुम्ही हरलात, तर तुम्हाला लाजिरवाणे पराजय पत्करावे लागेल. म्हणून युद्धाला उभे राहण्यापूर्वी विचार करा. मी अबला नाही, खांद्यावर भाला घेऊन समोर उभी राहिल्यास पेशव्यांनाही भारी पडेन. गरज पडली, तर हत्तीच्या पायाला साखळी बांधून तुमचे स्वागत करेन, नाहीतर मी होळकरांची सून नाही!” अहिल्याबाईंचा हा मुत्सद्दीपणा आणि आत्मविश्वास म्हणजे तळपती तलवारीसारखा आणि चमकणाऱ्या विजेप्रमाणे होता.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहिले. केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण भारतभर त्यांनी समाजहिताची कामे केली. त्यांनी अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट, रस्ते आणि पूल बांधले, जे आजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याशी तुलना करता येतील.

उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत त्यांनी व्यापार आणि हस्तकलेला चालना दिली. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांनी इंदोरहून संस्थानाची राजधानी महेश्वर येथे हलवली आणि तिथे कारागीर, विणकर, मजूर, कलावंत आणि साहित्यिकांसाठी जमीन, निवास आणि आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले. यामुळे महेश्वरी साड्या, पैठणी आणि धोतर यासारख्या हस्तकलेला प्रसिद्धी मिळाली, जी आजही लोकप्रिय आहे.

अहिल्याबाईंनी पशु-पक्ष्यांसाठी कुरणे राखली, मुंग्यांसाठी साखर, माश्यांसाठी कणकेचे गोळे, उन्हाळ्यात वाटसरूंसाठी पाणपोया आणि हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची व्यवस्था केली. त्यांच्या राज्यात सूक्ष्म जीवसुद्धा उपाशी राहू नयेत, याची काळजी त्यांनी घेतली. दिव्यांग, अनाथ आणि असहाय्य व्यक्तींचे पुनर्वसन, गोरगरिबांसाठी अन्नछत्रे, सदावर्त आणि वस्त्रवाटप यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या.

प्रवाशांसाठी जंगलमय भागातही आंबराया, बागा, वृक्षारोपण, विश्रांतीसाठी ओटे आणि धर्मशाळा बांधल्या. घाट बांधताना त्यांनी केवळ तज्ञांचे मत न घेता स्थानिक स्त्रियांशी चर्चा केली. घाटाच्या पायऱ्या कशा असाव्यात, कपडे धुताना बाळ ठेवण्यासाठी जागा, कपडे बदलण्यासाठी खोल्या यांसारख्या सूक्ष्म तपशिलांचा विचार करून त्यांनी घाटांची रचना केली.

सर्वधर्मसमभावाचा आदर्श ठेवून त्यांनी मंदिरे, मशिदी, दर्गे आणि विहार बांधले, तसेच अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीमुळे पर्यटनाला चालना मिळाली, मजुरांना रोजगार मिळाला आणि सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्र येऊन सामाजिक एकतेचा पाया रचला गेला. त्यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या शूरवीराशी आपल्या एकुलत्या मुलीचा आंतरजातीय विवाह घडवून जातीभेदाला छेद दिला.

अहिल्याबाई खऱ्या अर्थाने समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा कधीही आंधळेपणाने स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे मानवतेचा धर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता त्यांनी राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित ठेवून खाजगी उत्पन्नाचा उपयोगही लोककल्याणासाठी केला.

अशा अनेक विधायक कार्यांमुळे अहिल्याबाई खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता बनल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन!